Tag Archives: ड्रेक समीकरण

सगळे आहेत तरी कुठे?

मनोगत दिवाळी २०१२ मध्ये पूर्वप्रकाशित

आपण एक विचारखेळ खेळू. समजा तुम्ही नव्या ठिकाणी, नव्या घरी राहायला गेला आहात. ह्या नव्या घरी पहिल्या सकाळी उठल्यावर शेजार कसा आहे हे पाहावे ह्या उद्देशाने घराचे दार उघडून तुम्ही बाहेर उभे राहता. तुमच्या घरासमोर रस्ता आहे. रस्त्यापलीकडे आणि तुमच्या घराच्या दोन्ही बाजूंना घरे आहेत. परसात जाऊन पाहिले तर तिथूनही इतर घरे दिसत आहेत. मात्र, तुम्हाला कोणीच दिसत नाही. अगदी चिटपाखरूही नाही. तुम्हाला नवल वाटते. इथे घरे, रस्ता आहे त्या अर्थी ही राहण्यालायक जागा आहे, मग कोठेच काही हालचाल कशी दिसत नाही? बाहेर काही मिनिटे उभे राहून तुम्ही घरात येता आणि नुकत्याच घेतलेल्या अनुभवाचा नवलाने विचार करत राहता. तुम्हाला प्रश्न पडतो, सगळे आहेत तरी कुठे?

तुम्ही सर्व शक्यता विचारांत घेण्याचा प्रयत्न करता. कदाचित त्या घरांमध्ये राहणारी मंडळी घरांत असतील, बाहेर दिसली नाहीत म्हणून काय झाले? पण जर लोक घरांत असतील तर एवढी सामसूम कशी? आवाज नाही, हालचाल नाही! कदाचित मंडळी घरात असतील, पण लपली असतील. पण का लपतील? एवढा चांगला दिवस आहे, चांगले हवामान आहे, मग लोकांनी घरांत का लपावे? कदाचित लोक इथे राहत असतील, पण आता मी पाहायला गेले तेव्हा सगळे कुठेतरी गेले असतील. पण सगळे एकाच वेळी बाहेर का जातील? एखाद्या घरातही कोणी दिसू नये? माणूस नाही तरी एखादे मांजर, कुत्रा? अगदीच नाही तर एखादा पक्षी, एखादा किडा तरी? हे गौडबंगाल आहे तरी काय? सगळे आहेत तरी कुठे?

मग तुम्ही आणखी खोलात शिरता. कदाचित मी फारच कमी वेळ बाहेर उभी राहिले असेन. आणखी थोडा वेळ थांबले असते तर कदाचित दिसलेही असते कुणी. पण शेजारी कोणी नवीन राहायला आले आणि ती व्यक्ती बाहेर उभी दिसत असेल तर स्वत:हून येऊन ओळख करून घेण्यापुरतेही सौजन्य नाही कोणाकडे? कदाचित माणूसघाणी मंडळी राहत असावीत आसपास. पण सगळी मंडळी तशीच? नसतीलही सगळी माणूसघाणी, पण त्यांना त्यांचे व्याप असतील. दुसऱ्यांकडे बघण्याएवढा वेळ आहे कुणाकडे आजकाल? पण तरीही बाहेर कोणीतरी दिसायला, किमान काही आवाज तरी ऐकू यायला हवे होतेच हा विचार काही तुमच्या मनातून जात नाही. तुम्ही विचार करत राहता की सगळे आहेत तरी कुठे?

हे विचार करता करता एकीकडे तुम्ही बाहेर काही घडत आहे का ह्याचा कानोसा घेतच असता. विचार करण्यात काही मिनिटे जाऊनही तुम्हाला कुठलीच हालचाल जाणवत नाही. आता तुम्हाला काळजी वाटायला लागते. ही मंडळी आपापल्या घरात बसून नवीन आलेल्याला लपून न्याहाळत तर नसतील? कदाचित मी घरात येण्यापूर्वी कुणी इथे घुसून कुठे फटींत कॅमेरे तर बसवले नसतील? आणि ह्या कॅमेऱ्यांमधून त्यांनी माझ्यावर पाळत तर ठेवली नसेल? कदाचित ही मंडळी चांगली असतीलही, पण नवीन आलेल्या व्यक्तीच्या चांगुलपणाची खात्री पटल्याशिवाय ओळख देण्याची त्यांची पद्धत नसेल. पण अगदी सगळ्यांचीच ती पद्धत नसेल? कदाचित ह्या सोसायटीचा तसा नियमच असेल. हा विचार करण्यात आणखी वेळ जातो. बाहेर अजूनही सामसूम असते. सगळे आहेत तरी कुठे?

मग तुम्हाला वाटते की कदाचित मी इथे राहायला आल्याचे त्यांना माहीतच नसेल. मी नुसतीच बाहेर उभी राहिले. मी तरी कुठे फार हालचाल केली किंवा आवाज काढले? त्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही तसा मी तरी कुठे केला? असा विचार करत तुम्ही पुन्हा बाहेर जाता. घराच्या आजूबाजूला मुद्दाम थोडी लगबग करता. तरी शांतता. मग उगीच काही आवाज काढून पाहता. ‘कुणी आहे का? ‘ असे मोठ्याने ओरडून पाहता. पण उपयोग होत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडतो की ह्या गल्लीत, ह्या गावात तुम्ही एकटेच आहात की काय? सभोवतीची घरे पाहून तुम्ही एकटे असाल हे तुम्हाला काही केल्या पटत नाही. मग तुम्हाला वाटते की एखाद-दोन वेळा, तेही काही मिनिटांसाठी बाहेर उभे राहाणे पुरेसे नसेल. कदाचित संध्याकाळ-रात्रीपर्यंत, कदाचित काही दिवस (वा महिने वा वर्षे) वाट पाहिली तर दिसतीलही कुणी! पण आता ह्या क्षणाला सगळे आहेत तरी कुठे?

Image

अगदी हाच प्रश्न काही वर्षांपूर्वी विचारला तो भौतिकशास्त्राच्या नोबेल पारितोषिक विजेत्या एन्रिको फर्मीने. १९५० मध्ये लॉस ऍलमोस नॅशनल लॅबोरेटरीमध्ये हा शास्त्रज्ञ एमिल कोनोपिन्स्की, एडवर्ड टेलर आणि हेबेर यॉर्क ह्या त्याच्या सहकाऱ्यांसमवेत दुपारी जेवणासाठी निघाला होता. नेहमीप्रमाणे गप्पाटप्पा चालू होत्या. चर्चा उडत्या तबकड्यांवर आणि परग्रहवासीयांवर येऊन ठेपली. तेव्हा फर्मीने हा सुप्रसिद्ध प्रश्न विचारला – “सगळे आहेत तरी कुठे? ” ह्या विश्वाचे वय पाहता आणि त्यातील ताऱ्यांची संख्या पाहता, विश्वात जीवांचा बुजबुजाट दिसायला हवा. मात्र असे प्रगत वा अप्रगत परग्रहवासी असल्याचा आपल्याकडे पुरावा मात्र नाही. हाच तो सुप्रसिद्ध ‘फर्मीचा विरोधाभास’ (paradox). आपल्या विचारखेळातही तुम्ही जिथे राहायला गेला होता तिथला परिसर, घरे पाहता तिथे मनुष्यवस्ती, किमान पशुपक्षी वा किडे तरी दिसायला हवे होते, मात्र तसे कोणी दिसत नव्हते. म्हणजे तुम्ही फर्मीचा विरोधाभास अनुभवत होता.

Image
एन्रिको फर्मी (२९ सप्टेंबर १९०१ – २८ नोव्हेंबर १९५४)

आपल्या आकाशगंगेत सुमारे २ ते ४ खर्व (१ खर्व = १०० अब्ज = १०० बिलियन = १०११ ) तारे आहेत. विश्वात अशा अनेक दीर्घिका आहेत. त्यातील अगदी कमी ताऱ्यांभोवती ग्रह फिरत असतील, त्यातील अगदी कमी ग्रह त्या ताऱ्यांच्या वसतीयोग्य प्रदेशात असतील (अधिक माहितीसाठी वाचा – ग्रहमंडल दिव्यसभा), त्यातील अगदी कमी ग्रहांवर जीवसृष्टी असेल आणि त्यातील अगदी कमी प्रगत समाज असतील असे गृहीत धरले, तरी विश्वातील ताऱ्यांची प्रचंड संख्या पाहता (सध्या ती ७x१०२२ एवढी असल्याचे मानले जाते. ) विश्वात प्रगत सजीवांची संख्या बरीच असली पाहिजे. पण आजवर आपल्याला अशा एकाही समाजाच्या अस्तित्वाबद्दल पुरावे मिळू नयेत हे अतार्किक आहे. फर्मीने विचारलेल्या ह्या सुप्रसिद्ध प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे अनेकांनी प्रयत्न केले आणि अनेक करत आहेत. ह्या प्रश्नाची उत्तरे दोन प्रकारे मिळवता येतील. एक म्हणजे प्रत्यक्ष परग्रहवासी शोधणे वा किमान ते अस्तित्वात असल्याचा पुरावा शोधणे. दुसरे म्हणजे दोन गोष्टींचा तर्क करणे – एक तर ते असतील तर अजून आपल्याला ते का सापडले नाहीत ह्याचा तर्क व नसतील तर का नसतील ह्याचा तर्क.
तेव्हा फर्मीच्या विरोधाभासाची संभाव्य उत्तरे शोधण्याचे व तर्क मांडण्याचे काम अनेकांनी केले. फर्मीने हा सुप्रसिद्ध प्रश्न विचारल्याला दशक उलटून गेल्यावर फ्रॅंक ड्रेक ह्या अमेरिकी खगोलतज्ज्ञाने एक समीकरण मांडले. आपल्या आकाशगंगेमध्ये प्रगत जीवसृष्टी किती ठिकाणी असू शकेल ह्याचा अंदाज मांडणारे हे गणिती समीकरण असे –

N = ज्यांच्याशी संपर्क साधणे शक्य व्हावे अशा आपल्या आकाशगंगेतील परसमाजांची संख्या
आणि
R* = आपल्या आकाशगंगेतील तारेनिर्मितीचा सरासरी दर
fp = आकाशगंगेतील एकूण तार्‍यांशी भोवती ग्रह फिरत असणाऱ्या ताऱ्यांचे गुणोत्तर (अपूर्णांकाच्या स्वरूपात, fraction)
ne = अशा दर ताऱ्यामागे जीवसृष्टीस तगवू शकणाऱ्या ग्रहांची सरासरी संख्या
f = अशा ग्रहांशी प्रत्यक्षात जीवसृष्टी असणाऱ्या ग्रहांचे गुणोत्तर (अपूर्णांक, fraction)
fi = अशा वरील ग्रहांशी जिथे सजीवसृष्टी जगून, टिकून प्रगत समाज निर्माण झाले आहेत अशा ग्रहांचे गुणोत्तर (अपूर्णांक, fraction)
fc = अशा एकूण समाजांशी ज्यांच्या अस्तित्वाच्या खुणांचा माग काढता येऊ शकेल अशा तांत्रिकदृष्ट्या पुढारलेल्या समाजांचे गुणोत्तर (अपूर्णांक, fraction)
L = अशा वेध घेता येऊ शकणाऱ्या खुणा अवकाशात प्रक्षेपित करण्याचा समाजांचा कालावधी.

ह्या समीकरणातील काही घटकांच्या किंमतींचा अंदाजही आपल्याला करता येत नाही. विशेषत: शेवटच्या चार घटकांच्या किंमतींचा अंदाज करण्यासाठी आपल्याकडे पृथ्वीवरील समाज हे एकच उदाहरण आहे. सांख्यिकीच्या दृष्टीने केवळ एका उदाहरणावरून बांधलेला अंदाज कितपत योग्य ठरणार? तेव्हा ह्या घटकांच्या (कार्ल सेगनप्रमाणे) चढ्या किंमती गृहीत धरल्या तर ड्रेकच्या समीकरणाचे उत्तर आकाशगंगेमध्ये अनेक (लाखो) प्रगत समाज अस्तित्वात असू शकतात असे मिळते. आपले अस्तित्व N ची किंमत आपल्या आकाशगंगेसाठी किमान एक असल्याचे सांगते. शिवाय एखादा समाज एका ग्रहावर उदयास आला आणि तो त्या ग्रहावर लयाला जाण्यापूर्वी त्याने दुसऱ्या ग्रहावर वसाहत केली असण्याची शक्यता ड्रेक समीकरणामध्ये गृहीत धरलेली नाही. तरीही फर्मीच्या विरोधाभासाकडे गणिती दृष्टिकोनातून पाहण्याची संधी ड्रेक समीकरणाने आपल्याला दिली ह्यात वाद नाही.

परग्रहवासीयांचे अस्तित्व चाचपण्याचा थेट मार्ग म्हणजे त्यांचा वा त्यांच्या अस्तित्वाच्या खुणांचा वेध घेणे. हा फर्मीच्या विरोधाभासाकडे पाहण्याचा अगदी थेट मार्ग काहींनी चोखाळला. त्यातील प्रसिद्ध उदाहरण म्हणजे सेटी (SETI) – Search for Extra Terrestrial Intelligence – अर्थात पृथ्वीबाह्य बुद्धिमान जीवांचा शोध. मानव शारीरिक, मानसिक, औद्योगिक आणि तांत्रिकदृष्ट्या हळूहळू उत्क्रांत आणि प्रगत झाला आणि त्या प्रगतीच्या खुणा कधी जाणूनबुजून (उदाहरणार्थ वॉयेजर यान) तर कधी गरजेच्या परिणामत: (उदाहरणार्थ, भ्रमणध्वनी मनोऱ्यांनी प्रसारित केलेल्या व पृथ्वीभोवती फिरणाऱ्या दळणवळण उपग्रहांनी प्रसारित केलेल्या विद्युतचुंबकीय लहरी) त्याने अवकाशात प्रसारित केल्या आणि करत आहे. इतर समाजांनी जाणूनबुजून वा अनवधानाने उप-उत्पादन (by product) म्हणून प्रसारित केलेल्या लहरींचा वेध घेऊन त्यांचे विश्लेषण करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे काम सेटीने केले आहे. सेटीचे कार्य चालू आहेच, मात्र ह्या पद्धतीने परग्रहवासीयांचा शोध घेणे हे खडतर काम आहे. तरी नासा आणि इतर काही संस्थांनी सेटीला पाठिंबा देऊन त्यांच्या अनेक प्रकल्पांमध्ये सहभागी झाल्या आहेत.

ImageImage

फर्मीच्या विरोधाभासाकडे पाहण्याचा दुसरा मार्ग म्हणजे अर्थातच तर्क. आपल्या विचारखेळामध्ये आपण बाहेर सामसूम का असावी ह्याचा सर्वांगाने तर्क करून पाहिला. तर अशाच सर्वांगीण तर्काधारे आपल्याला कोणती उत्तरे मिळतात ते पाहू –

  • तर्क एक – पृथ्वीव्यतिरिक्त प्रगत समाज अस्तित्वात आहेत.मग आता प्रश्न उभे राहतात की ते कुठे असतील? आजवर आपल्याला त्यांचा वेध का घेता आला नसेल? अशा समाजांना आपला वेध घेणे का जमू शकले नसेल? किंवा त्यांनी आपला वेध घेतला आहे हे आपल्याला माहीतच नसेल का? असे समाज पृथ्वीवर पूर्वीच येऊन गेले असतील का? सध्याही ते लपून आपल्याला न्याहाळत असतील का? वगैरे वगैरे.
  • तर्क दोन – आपली पृथ्वी हा सजीव सृष्टीला जगवणारा, टिकवणारा व प्रगत करणारा असा एकमेव वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे.त्यामुळे इतरत्र जीवसृष्टी अस्तित्वात असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता तशी ती अस्तित्वातच नाही म्हटल्यावर तिच्या खाणाखुणा सापडणे अशक्यच आहे.

ह्या दोन्ही तर्कांवर उलटसुलट विचार करता आपल्याला अनेक शक्यता सापडतात. अनेकांनी मांडलेल्या अशा विविध शक्यतांचे संकलन अगदी रोचक आणि उद्बोधक ठरावे.

  • परग्रहवासी पृथ्वीवर आहेतच. –
  • आपल्याला ते दिसत नसले तरी ते इथे आहेत.
    उडत्या तबकड्या, खोदकाम करताना सापडलेल्या पुरावशेषांवरील चित्रे (उदाहरणार्थ, कोलो (टांझानिया), तस्सिली (सहारा वाळवंट), तोरो म्युएर्तो (पेरू), क्वेरातो (मेक्सिको), सेगो कॅन्यन (यूटा, यूएसए) येथील अश्मचित्रे), गुहांतील भिंतींवर सापडलेली चित्रे (उदाहरणार्थ, पेच मर्ल गुहा (फ्रान्स) वाल कामोनिका (इटली), किएव (युक्रेन) येथील भित्तिचित्रे आणि कोरीवकाम) आणि जगभरातील जुन्या ग्रंथांमधून आलेले उडत्या तबकड्या आणि परग्रहवासीयांचे उल्लेख हा त्यांच्या अस्तित्वाचा ढळढळीत पुरावा आहे. आतापर्यंत परग्रहवासी अनेकवेळा पृथ्वीला भेट देऊन गेले आहेत.

Imageपेरू देशात सापडलेले सचित्र दगड. सौजन्य – http://www.nephilimskulls.com/Articles.asp?ID=151

  • मानवाचे पूर्वज परग्रहवासी होते.अनेक पिढ्यांपूर्वी ते पृथ्वीवर आले. (पण मग हे मूळ लोक कुठे आहेत? )परग्रहवासीयांना आपण सापडले आहोत. मात्र त्यांनी आपल्याशी अजून संपर्क केलेला नाही.
  • नव्या, तरूण वंशांशी संपर्क करण्याचे त्यांचे काही नियम असतील (Prime Directive). सध्या ते आपल्याला लपून न्याहाळत असतील (प्राणीसंग्रहालय तर्क वा Zoo Hypothesis). आपल्या योग्यतेची खात्री पटताच योग्यवेळी ते प्रकट होतील (First Contact).
  • ह्या जगात पृथ्वीवरच केवळ सजीव सृष्टी आहे आणि मानवसमाज हाच एकमेव प्रगत समाज आहे. परग्रहवासी अस्तित्वातच नाहीत. अर्थात ही अतिशयोक्ती वाटते. पण असे का असेल ह्याबाबतचे तर्क पाहू –
    • जीवांच्या निर्मितीसाठी पोषक परिस्थिती असणारे ग्रह अगदीच दुर्मिळ आहेत.प्रत्येक ताऱ्याभोवती ग्रह फिरत नाहीत. ताऱ्यांभोवतीचे वसतीयोग्य प्रदेश फार अरुंद असतात. तेव्हा त्या ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह नेमका ह्या अरुंद पट्ट्यात असणे फार दुर्मिळ आहे.(मात्र, ताऱ्यांची आणि ग्रहांची एकूण संख्या पाहता हे अजिबात अशक्य नाही. आपला सूर्य अगदी सामान्य तारा आहे. सूर्याहून वयाने आणि आकाराने मोठे आणि लहान, असंख्य तारे विश्वात आहेत. तेव्हा त्यातले काही ताऱ्यांच्या वसतीयोग्य प्रदेशात असणे अगदीच शक्य आहे. )
    • पृथ्वीवर योग्य परिस्थिती होती म्हणून जीव निर्माण झाले. सजीव निर्माण होणे फार सोपे नाही.(मात्र, रसायने ही रसायने असतात. पृथ्वीवर पाण्याच्या एका रेणूत हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू असतो तसेा विश्वात कुठेही पाणी असेच असते. तेव्हा पृथ्वीवर जर योग्य रसायने एकत्र येऊन आदिसूप (Primordial Soup) तयार होऊन जीवनिर्मिती होऊ शकते तर अशी परिस्थिती इतरत्र उद्भवणेही सहज शक्य आहे. )
    • दीर्घिकांमध्ये सतत घडामोडी चालू असतात. तिथे गॅमा किरणांचे उत्सर्जन काय होते, अशनी ग्रहांवर काय आदळतात (आठवा डायनसॉर कसे नष्ट झाले ते). तेव्हा जीवसृष्टी निर्माण झाली तरी ती टिकणे फार दुर्मिळ असते.
    • पृथ्वीचा मोठा चंद्र हे एकमेवाद्वितीय संयोजन (combination) आहे.
    • आकाशगंगेतील आपणच पहिले प्रगत जीव आहोत.उत्क्रांतीचा वेग खूपच मंद असतो. उत्क्रांतीसाठी योग्य परिस्थितीची आवश्यकता असते. तेव्हा सजीव निर्माण झाले आणि जगले-तगले तरी त्यांची बुद्धी उत्क्रांत होऊन प्रगत समाज तयार होतीलच असे नाही.
  • परग्रहवासी अस्तित्वात आहेत, पण त्यांना आपल्याशी वा आपल्याला त्यांच्याशी संपर्क करणे जमलेले नाही. का? त्याची संभाव्य कारणे पाहू –
    • इतरत्र जीवसृष्टी तांत्रिकदृष्ट्या पुरेशी प्रगत नसावी.
    • समजा असली, तरी प्रकाशाच्या वेगाला मर्यादा आहे. आपण अजून प्रकाशाच्या वेगानेही प्रवास करू शकत नाही. जरी विद्युतचुंबकीय लहरींद्वारे संपर्क करायचा झाला तरी लाखो प्रकाशवर्षांचे अंतर कापण्यासाठी लाखो वर्षे लागतात. तोवर इथे पिढ्यानपिढ्या जगून मरतील.
    • प्रगत जीवसृष्टी अस्तित्वात आहेत, पण त्यांना त्यांचे व्याप आहेत, प्राधान्यक्रम आहेत. इतरत्र जीवसृष्टी आहे का ह्याचा विचार करण्याला आणि त्यांचा शोध घेण्याला ते प्राधान्य देत नसावेत. आपणही इतरत्र सृष्टी आहे का हे शोधण्याचा असा कितीसा प्रयत्न करतो? त्यावर पैसा खर्च करण्याला आपण तरी प्राधान्य देतो का? आपल्याला लोकसंख्या विस्फोट, अन्नटंचाई, महागाई, दहशतवाद वगैरे वगैरे अनेक प्रश्न आहेत. त्यांनाही असतील.
    • लहान मुलांना अनेक गोष्टींचे कुतूहल असते. मोठा झाल्यावर मी झुकझुकगाडी चालवीन, वैमानिक होईन, वगैरे वगैरे स्वप्ने तो पाहतो. लहानपणी त्याला ह्या गोष्टी करण्याला मर्यादा असतात आणि ते शक्य होत नाही. पण ट्रेन चालवणाऱ्याचा अपुरा पगार, वैमानिकाला असलेली जिवाची भीती, कामाच्या अनियमित वेळा आणि इतर नाना कटकटी पाहता मोठेपणी ट्रेन चालवणे, विमान उडवणे शक्य असले तरी आता त्याच प्रौढाला त्याची ही स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा राहात नाही. तसाच मानव समाज अजून बाल्यावस्थेत आहे, त्यामुळे आपल्याला आपण विश्वात एकटेच का वगैरे प्रश्न पडतात आणि अनेक मर्यादा असूनही त्यांची उत्तरे शोधण्याचे स्वप्न आपण पाहतो. इतर जीवसृष्टी आता प्रौढावस्थेत असतील आणि त्यांना तांत्रिकदृष्ट्या शक्य असले तरी इतर ग्रहांवरील जीवसृष्टी शोधण्याची त्यांना इच्छाच उरली नसेल.
    • जसे आपण करत आहोत तसे प्रगत परग्रहवासीयांनी इतरत्र जीवसृष्टी शोधण्याचे प्रयत्न केलेही असतील आणि अजून करतही असतील. पण आपण त्यांना अजून सापडले नसू. आपल्याला तरी ते कुठे सापडले आहेत?जेव्हा आपण परग्रहवासीयांचा शोध घेऊ पाहतो तेव्हा आपण रेडिओ दुर्बिणींद्वारे अवकाशातून मिळणाऱ्या रेडिओ व इतर स्रोतांचा वेध घेतो. मग त्या लहरींचे विश्लेषण करतो आणि पडताळणी घेतो. ह्या रेडिओ लहरींचा स्रोत प्रत्येकवेळी परग्रहवासीच असतील असे नाही. असला, तरी ह्या रेडिओ लहरी एक तर त्यांच्या अस्तित्वाची खूण म्हणून त्यांनी मुद्दाम प्रसारित केलेल्या असतील किंवा त्यांच्या ग्रहांवर ते एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत असलेल्या रेडिओ लहरींचा अवकाशात फेकला गेलेला तो अंश (leakage) असेल. ग्रहांकडून येणाऱ्या रेडिओ लहरी हा परग्रहवासीयांना शोधण्याचा एक उत्तम मार्ग असला तरी तो सोपा नाही. जसजसे आपण तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत गेलो तसतसे आपल्या दळणवळणासाठी वापरात असलेल्या रेडिओ लहरींचा अवकाशात फेकला जाणारा अंश कमी करण्यात आपण यश मिळवले. त्यामुळे आपल्या दळणवळणाची प्रत सुधारली हा आपला फायदा झाला. मात्र, परग्रहवासी पृथ्वीकडून येणाऱ्या अशा अंशात्मक रेडिओ लहरींचा वेध घेऊ पाहत असतील तर आता त्यांना मिळाणारा अंश पूर्वीपेक्षा क्षीण झाला. म्हणजे जोवर कोणी आपला वेध घ्यावा ह्या दृष्टीने आपण मुद्दाम असे रोडिओ लहरींचे अवकाशात प्रक्षेपण करत नाही, तोवर आपला वेध घेण्याचे इतरांना जमणे अवघड. शिवाय हे प्रक्षेपणही नेमके कोणत्या दिशेने करावे हे ठरवता येत नसल्यामुळे ते अंदाजाने करावे लागते. म्हणजे बाहेर कुणी असतील तरी आपण त्यांच्या दिशेने प्रक्षेपण केले नसल्याचा संभव खूपच. हे प्रक्षेपण केले तरी ह्या लहरींनी कापलेल्या अंतराबरोबर त्या क्षीण होत जाणार. तेव्हा दूरवर कोणी असले तरी आपल्या लहरी त्यांच्यापर्यंत पोहोचणे अवघड. थोडक्यात काय, तर आपण कुणाचा वेध घेऊ शकणे वा कुणी आपला वेध घेऊ शकणे ही गोष्ट अगदीच अवघड आहे. तेव्हा अजून आपल्याला कुणी सापडले नाही ह्यात काही नवल नाही. तरीही आपला प्रयत्न चालू आहे. न जाणो कधीकाळी सापडतीलही कोणी.
    • आकाशगंगेचे वय आहे १० अब्ज वर्षे. आपल्या पृथ्वीचे वय आहे सुमारे साडेचार अब्ज वर्षे आणि आता आपण ज्याला आधुनिक मानव म्हणतो तो २ लाख वर्षांपासून अस्तित्वात आहे. आपली तांत्रिक प्रगती तर गेल्या काही शतकांपासूनची आहे. वैश्विक कालमापनश्रेणी पाहता आपण वयाने आणि पुढारलेपणात फारच तान्हे आहोत. तेव्हा आपल्याला शोधण्यासाठी त्यांना पुरेसा वेळच मिळालेला नाही. किंवा, विश्वाच्या अफाट पसाऱ्यात प्रवास करत करत परग्रहवासीयांचा संकेत (signal) आपल्यापर्यंत पोहोचायला अजून वेळ असेल.
    • कदाचित ते इतरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतीलही. सध्या आपली धाव विद्युतचुंबकीय लहरी, गुरुत्व लहरी, असाधारण गुणधर्म असलेले भौतिक कण (exotic particles) ह्यांच्यामार्फत ते संपर्क साधतील असा विचार करण्यापर्यंत गेली आहे. परग्रहवासी कदाचित ह्यापेक्षा वेगळी संपर्कपद्धत वापरत असतील.
    • आपण गणिताला वैश्विक भाषा समजतो. पण आपले मानवी गणित परग्रहवासीयांच्या गणिताहून फार भिन्न, एकमेवाद्वितीय असेल आणि त्यामुळे त्यांनी पाठवलेले संकेत आपल्याला समजतच नसतील, म्हणजे ते संकेत पाठवत आहेत हेच आपल्याला उमगत नसेल.
    • प्रत्येक समाजाला कालमर्यादा असते. सजीव प्रगत होतात, समृद्धीच्या शिखरावर जातात आणि मग त्यांना उतरती कळा लागून ते नष्ट होतात. हाच निसर्गनियम असेल. त्यामुळे आपल्याआधी उत्क्रांत झालेले प्रगत परसमाज आता नष्ट झाले असतील. आपणही त्याच दिशेने चाललो आहोत. जागतिक तापमानवाढ, वाढती समुद्रपातळी, मानवनिर्मित कारणांमुळे निसर्गाचा ढासळलेला समतोल, विविध देशांचे घातक अणुकार्यक्रम, स्फोटके; आपला समाज नष्ट होण्यासाठी जरा कुठे खुट्ट होण्याचा तेवढा अवकाश आहे. परसमाजांचेही असेच झाले असू शकेल.
    • तांत्रिक प्रगतीच्या पुढचा टप्पा कदाचित अशारीर उत्क्रांतीचा असेल. शारीर मर्यादा ओलांडून प्रगत जीव अशारीर स्वरूपात उत्क्रांत होत असेल. शरीराला स्थळकाळाच्या मर्यादा असतात. एकदा अशारीर स्वरूपात गेले की स्थळकाळाचे बंधन राहत नसेल. प्रगत “जीव” असे अशारीर स्वरूपात असतील तर त्यांचा वेध तरी कसा घेणार?
    • कदाचित हे परसमाज वेगळ्या मितीत असतील. आपल्या जडवादापलीकडचे त्यांचे विश्व असेल. तिथे प्रकाशाचा वेग आपल्या विश्वापेक्षा कितीतरी जास्त असेल आणि दोन ग्रहांदरम्यानचा वा दोन ताऱ्यांदरम्यानचा प्रवास चुटकीसरशी होत असेल.
    • कदाचित प्रगत परसमाज दूरसंवेदनेद्वारा (telepathy) संपर्क साधू शकत असतील. एका परसमाजाची एकत्रित (collective) दूरसंवेदनलहर स्वीकारून त्यांना दुसरा परसमाज अशाच लहरींद्वारा उत्तर देऊन ते दळणवळण साधत असतील. अशा दूरसंवेदनतंत्रात आपण फार मागासलेले असल्यामुळे आपल्याशी त्या परसमाजांना काही देणेघेणे नसेल. किंवा, त्या तंत्रात आपण एवढे मागासलेले आहोत की आपण अस्तित्वात असल्याची त्यांना कल्पनाही नसेल.Imageथोडक्यात काय तर तर्क करावे तेवढे थोडकेच आणि शक्यता मांडाव्या तेवढ्या कमीच पडतील. यथावकाश, यदाकदाचित परग्रहवासीयांनी आपल्याशी संपर्क साधलाच तर आपण त्यांना कसे प्रत्युत्तर देऊ, आपली काय प्रतिक्रिया होईल, ते सुष्ट असतील की दुष्ट, ते त्यांच्यासोबत आपल्याला प्रगतीप्रत नेतील की आपल्यावर हल्ला करून आपल्याला नष्ट करतील, त्यांना आपण सापडण्याऐवजी आपल्याहून अप्रगत परसमाज आपल्याला सापडले तर आपली वसाहतवादी मानसिकता आणि इतिहास पाहता आपण त्यांना कसे वागवू, वगैरे वगैरे प्रश्न आपण चित्रपट लेखकांच्या कल्पनाभरारीवर सोडून द्यावे आणि उडत्या तबकड्या पाहिल्याचे शपथेवर सांगणाऱ्यांच्या मुलाखती दूरचित्रवाणीवर पाहत पुन्हा आपल्या उद्योगाला लागावे हेच बरे. तुम्हाला काय वाटते?
      संदर्भयादी –
      http://www.fermisparadox.com/
      http://abyss.uoregon.edu/~js/cosmo/lectures/lec28.html
      https://en.wikipedia.org/wiki/Fermi_paradox
      http://www.duntemann.com/fermiqsn.htm
      http://www.seti.org/seti-institute/project/details/fermi-paradox